श्री स्वयंभू – मी त्रिगुनातीत असणारे एक तत्व आहे, अन् अखंड तत्त्वाचा सेवेकरी, त्यांच्या चरणाचा एक कण आहे. जे स्वयमेव तत्व आहे की ज्याला कधीही खंड नाही. त्याला रात्र नाही आणि दिवसही नाही. वेळ काळ काही नाही असे जे परम तत्व आहे, त्या तत्त्वाच्या चरणांजवळ मी एक कण आहे.
त्रिगुण तत्वे त्यांनीच निर्माण केलेली आहेत. म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश ही तत्त्वे त्यांनीच निर्माण केलेली आहेत. स्वयंभू याचा अर्थ असा की, ज्यांनी सर्वस्वाला निर्माण केले ते ! तेच स्वयंभू आहेत.
समुद्रमंथनाच्या वेळी १४ रत्ने निघाली. त्यामध्ये विष हे एक निघाले. निर्माण झाले. ते कोणीही घेण्यास तयार झाले नाही. सगळ्यांनी चांगल्या चांगल्या वस्तू उचलल्या, पण हे कोणीच घेतले नाही. तेव्हा, काय करावे हा प्रश्न पडला. तेव्हा ते विष मी स्वतः घेतले अन् ते प्राशन केल्यानंतर काय स्थिती झाली. काय हाल झालेत ते माझेच मला माहित. ही माझी हाल अपेष्टा थांबेनाशी झाली तेव्हा मग त्या समर्थांनी, सद्गुरुंनी मला शांतता दिली. मग मी जर स्वयंभू असतो, तर ते विष मला जिरवता आले नसते का? मी जरी तर्पट असलो तरी सत तत्वासाठी भोळसट आहे. माझे भक्त काही असतील, काही विष्णूचे तर काही ब्रह्मदेवाचे असतील, पण जसे प्रकृतीचे अंग त्याप्रमाणे वर्तणूक असते. ©️
