हल्लीचा मानव अतिशय अहंकारी झाला आहे. त्याला गुरुपद कळलेले नाही. गुरुपद म्हणजे आकार आला, मानवाला त्याची सेवा करायला त्रासदायक होते, मग त्याला सद्गुरू चरण कसे सापडणार? ज्याला काही कळत नाही, जो उघड्या धोंड्याला शेंदूर थापून त्याला आकारात आणतो, त्याच्या पाया पडतो, त्याला बोलता येत नाही. अशा गोल आकारी दगडाच्या पाया पडणारा मानव, त्याला बोलत्या चालत्याचे दर्शन घ्यावयास लाज वाटते. असेच मानव आज पहात आहोत. काय चालले आहे हे कळते आहे, पण मानव फसतो आहे. मानवानेच आकार आणि मूर्ती बनवली. तिची स्थापना केली, पण त्याची व्यवस्था नसेल तर कुत्रा त्या ठिकाणी नीच कृत्य करतो. त्याच्याच मानव पाया पडतो. ईश्वर तत्व कुठे आहे हे त्याला कळत नाही. कुत्र्याने जरी नीच कर्म केले तरी त्यात सत् आहे. पाहणाऱ्यालाच दिसेल. पण दगड अन् कुत्रा सारखाच का? पण जो पाहिल, त्यालाच ते कळेल. म्हणून मानव श्रेष्ठ आहे.
भगवंताने आकार मानव रूपातच घेतला आहे. काही कुर्म, वराह सुद्धा अवतार झाले आहेत, पण मानवात अवतार घेऊन त्याने जागे केले तरी तो निद्रिस्त आहे. हे फक्त प्रकृतीचे चाळे आहेत. प्रकृती अंगाने सेवेकर्यांनी जाऊ नये. प्रकृती भिन्न आहे म्हणून सांगत आहे. भिन्न भिन्न प्रकृती | कर्मभेदे दिसती ||
प्रकृती भिन्न आहे. मानवाने विचाराने त्यांना नावे ठेवली आहेत. विचार आणि प्रकृतीला शुद्ध, अशुद्ध बनवले आहे. जर शुद्ध विचार असता तर हा वाद निर्माण झाला नसता. रंग भिन्न असेल पण तो प्रकृतीचा आहे. शिवू नको, विटाळ होईल. हे कोण म्हणते? तर प्रकृती ! मनाने अशुद्ध विचार ! असा जो मानव आहे, त्याला भगवंत सापडला आहे का? जाणणारा असेल तर त्याला हे सर्व एकच आहे. मानवाचे मन फिरते, त्याप्रमाणे मानव फिरतो.
मानव त्रिगुणांची उपासना करतात. कोणी विष्णूची, कोणी शंकराची ! म्हणून प्रकृतीचा वाद लागतो. मी सर्वस्व पहात असतो. भांडते ते अज्ञान भांडते. अज्ञानामुळेच जन्म कर्म ! ज्याला स्वयम ज्ञान आहे तो केव्हाही फसणार नाही. आज स्वयमेव शिवाची रात्र आहे. एकच, ॐ कार तत्त्व सर्वभूतेषु पश्य आहे. ते तत्व आहे. आकारात आहे म्हणून पाहता येते. आकारात नसेल तर कोणाचीही पाहण्याची हिंमत नाही. (समाप्त) ©️
