श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, सद्गुरुंकडून ज्ञान घेणे, त्यांच्याशी प्रश्नोत्तरे करुन ज्ञान वाढविणारी ज्योत अन् हा पांचवा प्रणव ज्या भक्ताना, ज्या सेवेकऱ्यांना प्रगट झाला असेल त्यालाच म्हणायचे सद्गुरु दर्शन ! मग अशा ठिकाणी मुक्ति राहीलीच कोठे? सद्गुरु दर्शन हीच मुक्ति ! चारही वेद जेथे मौनावले, मग चारही मुक्ति कुठे शिल्लक राहिल्या?
*स्थुलातून सुक्ष्म, सुक्ष्मातून कारण, कारणातून महाकारण देह म्हणजेच तेजोमय स्थिती.* हि शक्ति प्राप्त झाल्यानंतर आपण चारही देहांचे व्यवहार करु शकतो. या चार देहातून देखील ती ज्योत मुक्त होऊ शकते. कशामुळे? तर सद्गुरुमय झाल्यामुळे, तुम्हाला सद्गुरु दर्शन मिळाल्यामुळे ! मग चारही मुक्ति राहिल्याच कोठे? चारही मुक्तिच्या पलीकडे सद्गुरु तत्व आहे. अविनाशी परम तत्वच जर प्रगट झाले अन् त्यांच्या दर्शनात जर तुम्ही तादाम्य झालात, मग स्थुल राहील कोठे? अशा ज्योतीला देहभान रहात नाही. तेथेच समाधी लागते.
समाधी म्हणजे त्या अनंतांच्या शुभ्रप्रकाशाशी ज्योतीर्मय ह़ोणे अर्थात स्वत:चे जडत्व आपण विसरणे, जाणीव रहीत होणे, तटस्थ होऊन त्या स्थितीत रममाण होणे यालाच समाधी म्हणतात. जाणीव रहीत होणे, जवळ जवळ मृत्युसमान त्याची गती असते. त्याचा जीव त्रिकुटीत अविनाशाशी लयबध्द होऊन ब्रम्हांडी लय झालेला असतो. यालाच समाधी म्हणतात. मग आता मुक्ति राहीली कोठे? सत् चरण प्राप्त आहेत तिच मुक्ति ! ©️
