गोपाळ कृष्ण उर्फ घोडबंदरचे बाबा
श्री सद्गुरु माऊली – महाराज, आपला बच्चा संदेश मागत आहे. आपण आता काय करता?
गोपाळकृष्ण बाबा – सद्गुरु प्रेम, भक्ती प्रेम, भगवंत प्रेम अन् मायावी प्रेम यात फरक आहे. सद्गुरु भक्ती प्रेम अखंड आहे. त्याच्यात कधीही खंड पडला नाही. मात्र, मन मायावी प्रेमाच्या आधीन गेल्यानंतर ते त्याच्या प्राप्त होते. मनाच्या आधीन बनल्यानंतर स्वतःच स्वतःच्या पायावर दगड ओढून घेतो. त्यामुळे ही दशा प्राप्त होते. मी गुन्ह्याला पात्र आहे. बच्चा म्हणण्याची पात्रता माझ्या ठिकाणी राहिलेली नाही. यातून कृपा करून मोकळे केले तर बरे होईल. ओढाळ जनावर चुकले तरी समर्थ सोडत नाहीत. मी चुकीला पात्र आहे. आपण संदेश दिले होते की, जास्त दिवस त्या ठिकाणी राहू नका. पण मायेच्या लोभामुळे तसे घडले व त्याचे प्राय:श्चित्त मला मिळाले. तरी आता क्षमा करावी, ही इच्छा आपणाजवळ व्यक्त करीत आहे.
अखंड भक्तीचे प्रेम कोणीही तोडणार नाही. अखंड भक्तीच्या ठिकाणी श्रद्धायुक्त तऱ्हेने मानव राहील, तर त्याचे कोणी काहीही करू शकणार नाही. या आसनाच्या सानिध्यात असणारे सेवेकरी सर्वस्व सत् पुरुष आहेत. त्यांना सर्वस्व अधिकार आहेत, मात्र त्यांनी चमत्कार, नमस्काराला भाळू नये अन् त्यावर कुरघोडी करून अखंड प्रेमाचा झरा सोडून मायेवर भाळू नये.
मी सत्पुरुष असतो तर मायेमुळे फसलो नसतो. किती जरी वर्षांची तप:श्चर्या असली, त्याचे उदाहरण – १४०० वर्षांची चांग्याची तप:श्चर्या, पण १० वर्षाच्या पोरीने त्याला अनुग्रह दिला. मग अज्ञान कोण? माझा अज्ञानपणा माझ्या अंगाशी आला. ©️
