श्री समर्थ मालिक – सद्गुरू ज्ञान देतात. ज्ञान सर्वांना दिलेले आहे, बहाल केलेले आहे. ते जतन करून, त्याची जपणूक करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. परंतु ते सांभाळता येत नाही, त्या ज्ञानाची बूज राखली जात नाही. तरी सेवेकऱ्यांनी स्वतःच्या मनाचे शोधन केले पाहिजे.
मी सेवेकरी कोणाचा? मी कोण व माझे कर्तव्य काय? मायेच्या रहित कोणीही नाही, तरी सुद्धा सेवेकऱ्यांनी मोह मायेच्या अधीन जाता कामा नये. आपल्या सद्गुरुंचे आदेश, संदेश पाळून त्या दिशेने सेवेकरी राहिल, तर सत् त्याच्यापासून दूर राहणार नाही.
“सेवेकऱ्याने माझे कर्तव्य काय? अन् मी कोणाचा सेवेकरी? मी करतो काय अन् मी काय केले पाहिजे? याचा पूर्णत्वाने विचार केला पाहिजे. भंडार भरलेला आहे, पण लुटणारा पाहिजे.” तसेच “प्रेम सूत्र दोरी अशी बांधिली पाहिजे की एकाच जीवात, एकाच रज्जूत आपणांस डुंबून जाता आले पाहिजे. हेवेदावे, मनाचा कलुषितपणा, कुणाही गुरु बंधू भगिनींना नाराज न करणे हे आपण अंगिकारले पाहिजे. अशीच मनाची ठेवण प्रत्येक सेवेकऱ्याने ठेवली पाहिजे.”
येथून पुढे कुणीही कोणाची मनें दुखवू नका. एकमेकांशी वागताना, एकमेकांशी बोलताना आपण कसे वागतो, आपण कसे बोलतो ह्याचे भान ठेवूनच आपली वाटचाल ठेवावी. आश्रमात किंवा दरबारात असताना स्थानाचे भान राखूनच आपली कृती ठेवावी.
गुरु बंधूत्वाचे नाते फार श्रेष्ठ आहे याचे सगळ्यांनी भान ठेवावयास हवे आणि त्या प्रमाणे वागावयास हवे.©️
