श्री समर्थ मालिक –
कर्मसंचित हे कोणालाही सुटलेले नाही. कर्मसंचितावरच सर्व आधारलेले आहे. ते मानवांनाच काय पण तत्त्वांना अन मला पण सुटलेले नाही. हे कालचक्र आहे. या कालचक्राची गती ज्याप्रमाणे फिरेल त्याप्रमाणे मानव या कालचक्रात सापडला की मग मी कोण याची जाणीव त्याला राहत नाही.
सद्गुरु सानिध्यात असलेल्या ज्योती वाहणार नाहीत. वाहू लागल्या तर त्यांना अटकाव घातला जातो. ही कालचक्र गती कोणालाही सुटलेली नाही. पण मानवांनी कर्तव्यात तत्पर असले पाहिजे, जाणीव आहे आपणाला. भावी ज्योत त्या ठिकाणी आहे याची कल्पना आपणाला असेलच. सेवेकऱ्यांना जाणीव पाहिजे की प्रत्यक्ष अखंड तत्व अहोरात्र त्या ठिकाणी राबत आहे याची जाणीव आहे आपणाला!
सेवेकरी अन सद्गुरु निराळे आहेत का? सेवेकरी म्हटला की तो सद्गुरू चरणात रममाण पाहिजे. तो रममाण असेल तर सद्गुरु त्यांचे दास आहेत. माया ही तीन ताळ, सप्त पाताळ, एकवीस स्वर्ग भरून उरली आहे, पण तिलाही विचारणारे एक तत्त्व आहे ना? मायेला घट आहे, पण त्या सत् तत्त्वाला घट नाही. म्हणून माझ्यापेक्षाही ते तत्व श्रेष्ठ आहे.
माया ही सर्व ठिकाणी, पंचमहाभूतातही आहे. पंचमहाभूते तिच्या आधीन आहेत. ते तिचे दास आहेत, पण मायेला सुद्धा विचार करावा लागतो. एकदा सद्गुरूंनी कब्जा केल्यानंतर, ज्योतीला ताब्यात घेतल्यानंतर काळाची ही भीती नाही, पण ज्योती त्या तऱ्हेच्या पाहिजेत. कर्तव्यें ही तत्त्वांना दिलेली आहेत. ती तत्वे आपले कर्तव्यें पार पाडण्यासाठी उभी असतात. त्या तत्त्वांची सेवेकऱ्यांना जाणीव घ्यायची आहे. भीती धरायची नाही. ज्याला हे मर्म सापडले त्याला भीती नाही. मग पंचतत्वाची भीती कसली?
स्वतःच्या आईची जी शक्ती आहे ती मला पण घेता येत नाही. सद्गुरु अन स्वतःची आई हे दोन आधार उभे असताना चिंता करावयाची नाही. आई म्हणजे काय? माया नव्हे, आई म्हणजे ममता! हे दोन आधार असल्यानंतर त्रिभुवनात त्या सेवेकर्याला कोणीही बाधा आणू शकणार नाही. ©️
