श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य वगैरे काही नाही. मला कोणीही पाहू शकणार नाही. पाहता येणार नाही. जो पहावयास आला, तो माझ्यातच रममाण झाला. लयबद्ध झाला. मला अनंत हस्त, अनंत चक्षू, अनंत पाद असा मी आहे. माझे वर्णन कोणालाही करता येणार नाही. फक्त भक्तांचे कोड कौतुक पुरविण्यासाठी, आकारी खेळ खेळावे लागतात. स्वरूपीच लीन होऊन दर्शन होते. आकाराला धरूनच निराकारापर्यंत जाता येते. आकाराशिवाय निराकाराची गती मिळत नाही.
एकदम निराकारापर्यंत कोणीही मानव येणार नाही अन् अजून पर्यंत आलेला नाही. प्रत्येक मानवात माझा वास आहे. मी वास करीत आहे. काही संतांना हे माहित आहे. तीच जाण एखाद्या आकाराकडून माहीत करून घ्यावयाची असते. त्याच आकाराला सद्गुरु म्हणतात, त्याच आकाराला ॐ कार म्हणतात ! मग माझे सद्गुरु तेच ! अन् ॐ कारही तेच !
अखंड तत्त्वापासूनच ॐ कारांची निर्मिती आहे. बाकी दुसरे काय? ज्याला कळत नाही त्याला सांगण्याची आवश्यकता नाही. मायावीत लपेटलेले आहेत त्यांना ब्रह्मज्ञान सांगण्याची आवश्यकता नाही.
सत् असताचे वाद होण्याचे कारण हे सर्व प्रकृतीचे खेळ आहेत. भिन्न काय आणि अभिन्न काय, हे न समजल्यामुळे भीड निर्माण होते, भांड निर्माण होतात. त्या ठिकाणी मी फक्त पाहत असतो. आपणाला पूर्णत्वाने गती आहे की वादविवाद करतो कोण? आपले मनच वादविवाद निर्माण करीत असते. त्यामुळे थोडा तरी मनाला लगाम घालणे हे संदेश आहेत.
केवड्याची निर्मिती केतकीच्या झाडावर असते. केवड्याचा सुगंध आला कि मानव त्या ठिकाणी धावतो. मानव मायेला बाळगतो, सुगंधाला भाळतो, मोठेपणाला भाळतो. म्हणून मोठेपणाला भाळू नका. ऋद्धी सिद्धीला भाळू नका. सत संचिताची तिजोरी साठवून बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. (समाप्त) ©️
