श्री समर्थ मालिक – “एक तत्त्व नाम दृढ धरी मना |” जो आपली भावना दृढ धरून, त्या तत्त्वाशी ठाम राहू शकतो, एक सेकंद सुद्धा इकडे तिकडे ढळत नाही, तो सेवेकरी कदापिही वाया जाऊ शकणार नाही आणि जाणारही नाही, पण मनाची चंचलता वाढली तर मात्र त्याचे त्याने समजावे. मी सांगण्यात अर्थ नाही.
शरीर हे जडत्व आहे. तेव्हा जडत्वावर वाटेल ते व्याप, मायावी तऱ्हेचे म्हणा किंवा आणखी काही म्हणा, जर झाले, तर, सेवेकऱ्याने मनाची जी स्थीरता, जी अदला बदल होते, ती होऊ न देता स्थीर राहण्याचा प्रयत्न करणे. जेवढी होता होईल तेवढी शांती टिकविण्याचा प्रयत्न करणे, तदनंतर त्याचा उपभोग घेणे, अवश्य मिळेल. हे मात्र असत नाही, सत्य आहे. त्याप्रमाणे आपापल्या कर्तव्यात, अखंड नामात, मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करणे.
आपल्या संगतीने काय येणार, हे सेवेकऱ्यांना माहित झाले असेलच. संगती जे येईल तेच घेण्याचा प्रयत्न करणे. या जन्मी कमावलेली सत् संपत्ती, तिचा पुढील जन्मी उपभोग घेता येईल. सध्या दुःख वाटते, पण दुःख वाटून न घेता शांत रितीने राहणे, वावरणे हे सेवेकऱ्यांचे कर्तव्य आहे व हे संदेश आहेत. ©️
