श्री समर्थ मालिक – प्रकृतीच्या रहित मी आहे का? पण मीच सर्व करतो असे म्हणता येईल का? हि जी मेख आहे, तो कोण हे ओळखा. तो जर या जातीतील असेल, षड्विकार रहित असेल तर त्याला सर्वस्व बहाल केले जाते. ज्याने ही खूण ओळखली त्याला वेद कोठून सुटतात, प्रणव कोठून निघतात, आनंदी वातावरणात कोण होता, सहस्त्र दलांच्या प्रकाशाच्या अनुसंधनाने तल्लीन होत सद्गुरु कृपेने त्याला ऐकावयास मिळते. त्याला शुद्धी असते का? मग बोलतो कोण? प्रकृती सद्गुरूंच्या ठिकाणी लय केली मग राहील काय? ज्याचा तोच आनंद घेतो. ज्याचा तोच देतो. ज्योतीत ज्योत मिलन झाल्यानंतर बाकी काय उरते? प्रकृतीचा पूर्ण विसर पडल्यानंतर बोलणे चालणे कोणाशी होते? त्यातून उतरल्यानंतर प्रकृती शुद्धीत येते, पण सर्वस्व पूर्णात् पूर्ण विलिन झाल्यानंतर प्रकृती बोलते का?
म्हणून, “देव पहावयासी गेलो | देव होऊनची ठेलो ||” मग आनंदी वातावरणात होता कोण? आनंद देतो कोण? जडत्व जे आहे, ती माया आहे. चेतना दिली आहे. त्यायोगाने आकाराशी शरण जाऊन महान तत्व कोठे आहे हे समजेल. महान तत्वाचा अंत नाही. सापडले आहे का? प्रत्येकाच्या जवळ आहे. त्यात तल्लीन झाला तर सांगता येत नाही. मग जे अलिप्त आहे, ते कसे कळणार? मग कर्ता करविता कोण? यात मानवाने काय घ्यावयाचे? अन् म्हणूनच बोल अमर आहे. नाद अमर आहे. कोठून निघतो अन् जातो कोठे?
इतके सांगा की, अखंडापासून सर्वस्व होते, ते आकारी आहे, निराकारी पण आहे. स्थूल सोडले तरी सूक्ष्म, कारण, महाकारणापर्यंत जरी गेला तरी ते आकारी असते. अनु रेणू परमाणु पर्यंत जाण्याची पात्रता आहे की नाही ते मी सांगू शकत नाही. जरी याच्या पलीकडे गेला पण अहंकारी बनला तर नाश करण्यात येतो. म्हणून प्रकृतीला मंत्र तंत्र मिळाले म्हणजे ती प्रकृती अहंकारी बनते. प्रकृती जर तत्त्वासमान बनली तर त्यात तल्लीन होते. तशी प्रकृती नसेल तर त्याला काही कळणार नाही. प्रकृती अशा तऱ्हेची होईल त्यावेळी त्याचा तोच ऐकतो. त्याचा तोच बोलतो. प्रकृती धारण करणारी एक महान शक्ती आहे. आपण सेवेकरी आहात. आला कोठून? जायचे कोठे? याचा शोध घेणे हेच संदेश आहेत. (समाप्त) ©️
