श्री समर्थ मालिक – वेद अनंत बोलीला | अर्थ इतुकाचि साधिला || निज निष्ठे नाम गावे | शरण विठ्ठलाशी जावे || वेद गातो कोण? अन् तदनंतर शरण कोणाला जातो कोण? वेदना झाल्याशिवाय बोल बाहेर पडत नाही. चेतना झाल्याशिवाय वेदना निर्माण होणार नाहीत. वेदांचे घर्षण झाल्याशिवाय बोल बाहेर पडत नाही. बोल हेच वेद आहेत. अनंत जेथून वेदना ! ज्याचा अंत नाही ते अनंत !
शरण विठ्ठलासी जावे, मग विठ्ठल हे तत्व वेगळे आहे का? तर नाही. एकाच तत्वापासून सर्वस्व खेळ होतात. अखंड चैतन्य नसेल तर प्रकृतीस चेतना निर्माण होईल का? चेतना निर्माण झाल्यावर, वेद म्हणजे वेदना निर्माण होतात. वेदनांना सुरुवात झाली की बोल बाहेर पडतात. जो मानव यात रममाण आहे, त्याला ते कळेल. इतरांना हे कळणार नाही.
शरण विठ्ठलासी जावे | विठ्ठल स्वरूपी म्हणजे आकारी रूप धारण केल्यानंतर आकाराशिवाय निराकाराची माहिती होत नाही. म्हणून आकाराला शरण जावे. तरीपण आकार कोणत्या तत्त्वावर अवलंबून आहे?
प्रत्येक मानव हा आकारी आहे. आकारी असून सुद्धा तो ॐ कार स्वरूपी बनला का? या ठिकाणी सर्वस्व सेवेकरी आहेत. ते आकारी आहेत, पण ते ॐ कार स्वरूपी बनले आहेत का? जर ॐ कार स्वरूपी बनले म्हणावे तर मद, मत्सर, अहंकार, त्यांनी मारलेला आहे का? मग या ठिकाणी हेवे-दावे, मी-तू का होते?
म्हणून षड्विकार मारण्याचा प्रयत्न करून, लिनता, नम्रता, शांती या त्रिवेणी संगमात स्नान करीत रहा. कोणी काहीही म्हणो, मी कोणी नाही अन् स्वतःच्या स्वरूपी लिन राहील तेव्हा तो ॐकार स्वरूपी बनेल. असा बनल्यानंतर त्याच्याजवळ अहंकाराचा, मी पणाचा वास राहील का? जोपर्यंत ॐ कार स्वरूपी निमग्न नाही, तोपर्यंत वेद गातो कोण? अनंत कोण? शरण जातो कोण? आकाराच्या रूपाशीच बोलणे असते. पण कोणत्या तत्त्वाच्या आधारे तो बोलतो? त्याची गती घेईल तेव्हा तो ॐ कार स्वरूपी बनेल. ©️
