श्री समर्थ मालिक – कोणताही सत् पुरुष आपला मोक्ष आपल्या कृतीने साध्य करून घेत असतो. आपल्या कृतीनेच मुक्त होतो. प्रत्यक्ष गोपाळ याला काशीत अनुग्रह दिला, पण ही ज्योत ऋद्धी सिद्धी, तंत्र मंत्र याच्या आहारी गेली अन् घसरली.
कोणत्या सत्पुरुषाला अशा प्रकारचा रोग झाला होता का? अजून त्याची सव्वाचार वर्षे बाकी होती. पण प्रणव गेलेला आहे. भक्ती युक्त ज्योतीने, सतपुरुषाने अहंकारी बनणे योग्य नाही. सत भक्तीयुक्त गतीने जाणारा मार्ग हा सोज्वळ आहे. त्यात काटेकुटे, दगड धोंडे, डोंगरदरी वगैरे काहीही नाही. अशा मार्गाने जाणाऱ्या प्राण्याला खंदकात जाण्याची आवश्यकता काय?
मागे काही सेवेकर्यांचे बहुमत झाले होते की मालिक तुम्ही सर्व काही करता. सर्वस्व मालिक जर करतात असे आहे, मग थोडीशी चूक दाखवली आणि जर सर्वस्व माझे आहे, मग अर्पण करण्याच्या वेळी मागेपुढे का होतो? मी सर्वस्व करतो मग बोटे मोडण्याची आवश्यकता काय? तुम्ही काय करता आणि काय करणार आहात, यातील मुद्दे सेवेकऱ्याला कळलेले नाही. तुम्ही देऊन देऊन तरी काय देणार आहात? तुमच्याजवळ काय आहे? खाता, पिता, लेता कोणाचे आणि कोणाला देता? कुणाचे खाता? म्हणून त्यातल्या त्यात सेवेकऱ्यांनो विचारवंत होण्याचा प्रयत्न करा. त्याप्रमाणे बोल टाका.
मी करून ही अकर्ता आहे. त्याला कारण एकच, हे गृह्य मनात ठेवून सेवेकऱ्याने त्याप्रमाणे वाटचाल करणे. मी निमित्त. हे सर्वस्व समर्थ कृपेने होत आहे. तेच माझ्याकडून कर्तव्य करून घेत आहेत. मी निमित्त मात्र आहे. याप्रमाणे शांतपणे वाटचाल करण्याचा प्रयत्न करा. भक्तीचे मूळ सापडले असताना, लोखंडाचे चणे खाण्याचे मागे लागू नये.
माझी भक्ती जरी करीत असला तरी जो त्यात रममाण होईल त्याला अगदी सोपे आहे. म्हणून ही भक्ती जितकी कठीण तितकीच सोपी आहे. पूर्व योनीत दोन तपे सानिध्यात काढलेली ज्योत आता काही ६०-६५ वर्षांची झाली असेल. आत्ता अनुग्रह मिळाला. कारण हा विसरभोळेपणा आणि यामुळे कामाची दिशा सत्, असत असल्याने अवधी लागला. कारण माया ही कोणाला नको आहे? म्हणून थोडेसे लांबविले. (समाप्त)©️
