श्रीकृष्ण जयंती – ज्या ज्या युगामध्ये मानव अघोरी कृत्य करून पराकोटीला जातात, त्या त्या वेळेला अवतार कार्य नटवावे लागते. कर्तव्याची आखणी आधीच झालेली असते. त्याप्रमाणे ते कर्तव्य अवतार कार्य नटवून पार पाडावे लागते. अवतार कार्याची गती जरी वेगळी असली तरी मानवाला प्रत्यक्ष कोण आहेत याची जाणीव देऊन कर्तव्याची पण संपूर्ण जाणीव दिलेली आहे. अनेक लिलेने खेळ केलेले आहेत, अवतार नटवले आहेत ते कशासाठी? सताला पूर्णत्वाने संरक्षण देऊन सत कर्तव्ये पार पाडण्यासाठीच हे केले आहे. सत कर्तव्ये पार पाडत असताना अघोरांचा नि:पात करणे यासाठीच कर्तव्य केले आहे.
अवतार कार्याची दोन टोके आहेत एक सत तर दुसरे पराकोटीला गेलेले असत! या दोन्हीचा समन्वय कसा साधला हे या अवतार कार्याचे मर्म आहे. दोन्हीही आप्तस्वकीय असताना याचा विचार न करता सत कर्तव्य पार पडले आहे. असताचे ठिकाणी जर सताचा अंश असला तरी पण मानव ईश तत्त्वाला विसरून मायावीत गुरफटतो. मग त्याला स्वतःची जाणीव होत नाही. त्यामुळे तो अहंकाराने बरबटल्याने त्याचे वलय त्याच्याच भोवती निर्माण होते. ते वलय तोडण्याची ताकद त्याच्यात नाही. तेव्हा या अवतारात सत तत्वाचे तारण कसे केले हे दाखवले आहे. ©️
