श्री नर्मदा निवासी मालिक – सध्याच्या चालू परिस्थितीमध्ये सत किती आणि असत किती प्रमाणात आहे हे आपणास पूर्ण माहित आहे अन् याचा उहापोह मागे केलेला आहे. आजच्या परिस्थितीत सतावर पुष्कळ दडपण आहे, तरी सुद्धा कर्तव्य होत आहे. म्हणून पुष्कळ त्रास होतो. आता थोडे दिवस बाकी राहिले आहेत. मग आपणास कळेल कुणाची बाजू सरस आहे ते.
आसनाची मर्यादा ही ठेवलीच पाहिजे. महान तत्व, महान पद जरी असले तरी त्याच्याकडून चुका होतात. मग मानवांचे काय? लाघवी तऱ्हा मी करू शकत नाही. लाघवी तऱ्हा करणारे करतात. माझे त्यात काही नाही.
भक्तीची अंगे दोन आहेत – १) एक सत् भक्ती अन् २) दुसरी असत भक्ती. म्हणून त्या ठिकाणी लाघवी तऱ्हा होत असते. सताचेही भक्त आहेत आणि अघोरही भक्त आहेत, म्हणून दोन्हीही आपआपल्या तऱ्हेने भक्तांना वाचविण्याचा प्रयत्न करतात. पण सत् हे सतच आहे. ते सताचीच बाजू घेत असते. अखेर सताचाच विजय होतो. मायेचा विजय होणे दुरापास्त आहे. सत् भक्तासाठी कष्ट सोसणे हे सताचे कर्तव्य आहे. सताला दुःखाच्या डोंगरातून, काट्याकुट्यातून पार पडायचे असते. अन् ते सत् काट्याकुट्यातून, बिकट मार्गातून पार पडून जातेच जाते. हा आताचाच अनुभव नाही. आदी अंतापासून हेच चाललेले आहे. जो सत् भक्तीत शिरला तो कष्टातच शिरला. त्याच्या खांद्यावर कष्टाचीच झालर असते. ते कष्ट भोगत भोगतच अखेर सत अघोराचा नि:पात करते. तरी सुद्धा सर्वस्व अघोर खतम करतील हे मी समजू शकत नाही. इतकेच काही दिवसानंतर हे सत् जास्त प्रमाणात होईल. किती वर्षे हे घर्षण चाललेले आहे. तरीही हे अजून चालूच आहे. जास्तीत जास्त हे शुद्धीकरण सहा महिने चालेल. त्यानंतर शांत वातावरण निर्माण होईल. या ठिकाणी काही सेवेकरी सद्भक्तीसाठी तहानलेले आहेत. ते येण्याचे मार्गी लागतील. तदनंतर कर्तव्य सुलभ होईल. थोडे दिवस त्रास होईल. जे सेवेकरी माझी उपासना करतात, त्यांच्यावर माझे लक्ष आहे. मानसिक त्रास आहे हे मला मान्य आहे. पण हे भोगत्व आहे. उसने पासने आहे. (समाप्त)©️
