ज्या वेळेला दहा इंद्रिये एकत्र करून अकराव्यात तल्लीन झाला, स्व: स्वरूप प्रगट झाले त्याच स्वरूपाच्या ठिकाणी पूर्णत्वाने निमग्न झाल्यानंतर त्यालाच समाधी म्हणतात. अशी गती मिळाल्यानंतर देव पहावयासी गेलो | देव होवोनची ठेलो अशी गती मिळते. मग सांगा पंढरीत विठ्ठल आहेत का कुठे आहेत?
आपल्याच हृदयी सद्गुरूंचा वास आहे. मन रानोमाळ भटकण्याची आवश्यकता काय? परंतु ही इंद्रिये केव्हा आणि कधी निमग्न होतील? प्रत्येक सेवेकऱ्याचे मन शुद्ध सात्विक असेल तर सद्गुरु दूर नाहीत. काशी, गया, वगैरे काही करावयास नको. पतिव्रता ही पतीला मानण्यावर आहे. स्त्री प्रतिव्रता असली तर परमेश्वर भेटण्यास येतील. असे कितीतरी भगवंताच्या नावाने ओरडत असतील पण कृतिमान आहेत कां? भगवंताला काय पाहिजे आहे? काही नको. फक्त त्याच्या मनाचा शुद्धपणा, मनाची ठेवण हेच पाहतात, बाकी काही पाहत नाहीत.
पण इतकेच आहे, मन कसे शुद्ध होईल याचा प्रथम शोध केला पाहिजे. तेव्हा हे मन शुद्ध कोण करणार? सेवेकरी करणार नाही का? तर नाही. मग कोण करणार? तर सद्गुरुंशिवाय हे करणारे कोणी नाही. “मन हे मज पासोनी जाण |” मग मन आळवले असा योगी कोण? हे जरी मजपासून असले तरी प्रत्येकाची प्रकृती त्याच्या स्वाधीन आहे का? आणि म्हणूनच मनाची ठेवण, त्या तऱ्हेने चाचपणी असते. प्रकृती शुद्ध नाही म्हणून मन गढूळ ! प्रकृतीच्या तरंगामुळे मन चल बिचल होते. भूमी शुद्ध झाल्यानंतर कृतीमान असले पाहिजे, अन हे जर टिकविले, मग प्रश्नच नाही. मग मन गढूळ होईल का? ©️
(ता.क. : क्षमस्व ! कालचे प्रवचन हे अगोदरच्या दिवशी प्रकाशित झालेल्या प्रवचनाची पुनरुक्ती होती, तरी हि गोष्ट आपल्या गुरुबंधू भगिनीनी लक्षात आणून दिली. धन्यवाद 🙏)
