श्री समर्थ मालिक – मानव मनाच्या आधीन बनून उच्च आणि नीच या दृष्टिकोनातून चालला मग मात्र सत् भक्ती मार्गातून तो फसला जातो. यामुळे त्याला सद्गती मिळणे फारच दुरापास्त असते. इतकेच सांगावयाचे आहे, याची मेख जाणणाऱ्यानेच जाणली आहे अन् म्हणूनच ते मोक्षाचे वाटेकरी झाले.
हल्लीच्या काळात गुरु म्हणजे वेगळे तत्व व परमेश्वर वेगळे तत्व आहे असे म्हणणारे मानव आहेत. मन जे आहे, ते म्हणजेच माया ! म्हणजेच प्रकृती ! पंचमहाभूतांचे कवच, त्यामध्ये ते शांत, धीर, गंभीर बसलेले आहेत, त्या सताच्या चेतनेनेच ही प्रकृती मजा लुटते. चैन करते. तेच सत, या प्रकृतीच्या अंगाला मौजमजा लुटू देते व आपण चुपचाप राहते. पण त्यांचे पूर्णत्वाने लक्ष असते कि हे कुठपर्यंत धावते? पण जी प्रकृती नाममय, शुद्ध स्फटिकासारखी आहे, त्या आकाराला मार्गावर आणण्याचा तेच प्रयत्न करतात. जो आकार आहे, जडत्व आहे, पंचमहाभूतांचे कवच आहे, त्यातच मी राहतो, म्हणजेच माझे वास्तव्य आहे. त्यामुळे सर्वस्व शुद्ध, अशुद्ध, त्यांना माहीत असते. त्याचप्रमाणे पूर्वजन्मीचे संचित प्रकृतीचे किती आहे, याची पूर्णत्वाने जाणीव त्यांना असते. त्याच्याच अनुरोधाने ते त्यांना शुद्धीवर आणून मार्गस्थ करतात. मग आकार हा तत्त्वाच्या रहित आहे का? मग तत्त्वाने आकार पोसला गेला की आकाराने तत्व पोसले? मग आपणाला काय पाहिजे? तत्व पाहिजे का? यामुळेच सेवेकरी फसला जातो. ©️
