श्री विठ्ठल – सद्गुरूंची चलाखी ही तरी कोणत्या सेवेकर्याला कळली आहे का? साधे, सुलभ. कधीतरी लहरीत असल्यानंतर बोल फेकतात. ते मार्मिक बोल कसे आहेत हे सेवेकर्यांनी ओळखावे. सहज बोलणे यात मर्म आहे. हाच उपदेश आहे. आज सेवेकर्यांनी घेण्याचा प्रयत्न करावा. सद्गुरु कृपेने स्वतःची खूण स्वतःच ओळखली नाही, तर तो मानव आहे हे सिद्ध होत नाही. मानव आहे हे ज्याने ओळखले, त्यालाच सापडले. ज्याने ओळखले नाही, त्याला सत तरी कसा अंत देईल?
मोठ मोठी प्रवचने सांगतात. त्याने जर ईश्वर पाहिला, तरच तो सांगतो की जगात परमेश्वर आहे. खरे पाहिले तर, पूर्वीचे महामुनी, महायोगी यांनी कधीही कीर्तने सांगितली नाहीत. रामदास, तुकाराम, नामदेव आदींनी कीर्तने केली, ती मानव सुधारण्यासाठीच केली. भक्तीचे वळण दाखविण्यासाठी केली.
आता पंढरीला पुष्कळ भक्त येतात व मंदिरात पुष्कळ गर्दी होते. कोणी बडव्यांच्या सोटक्यामुळे जवळ सुद्धा येत नाहीत. मग तो भक्त असे म्हणावे का? बडव्यांना तरी कळले आहे का? पैशासाठी सारखी मारझोड चाललेली असते. जो भक्त आहे, त्याला काही सांगावे लागत नाही. तो जिथे बसेल, तेथेच तटस्थ राहील व विठ्ठल कोठे आहे हे पाहिल.
आम्हाला कोणीतरी अधिकार दिलेले आहेत. त्याप्रमाणेच आम्ही चालतो. ज्या ठिकाणी बसाल, त्या ठिकाणीच मला पाहू शकाल. मी कोणत्या रूपात आहे, हे कोणी पाहिले आहे का? मी कोणत्या रूपात त्या ठिकाणी आहे? खांद्यावर घोंगडी, हातात काठी घेऊन आलो. नंतर मी बाल स्वरूपात आहे, हे कोणी पाहिले आहे का? मानव हा चुकीला पात्र आहे. पण तो जर स्वतःला जखडून राहील तर त्याच्याकडून चुका होणार नाहीत. (समाप्त) ©️
