भक्तीत रममाण होणे हे सेवेकऱ्याचे कर्तव्य आहे. जे भोगत्व आहे, ते कोणासही सुटलेले नाही. भोगत्व नसेल तर तो धुतल्या तांदळासारखा स्वच्छ असतो. फक्त कस घ्यावयाचा असेल, तर तो मीच घेऊ शकतो, इतर कोणीही नाही.
देही जर पंढरी बनली, तर तो बाकी उरला आहे असे होईल का? तर नाही. असा जर तो भक्त झाला, तर माझे लक्ष त्या भक्ताकडे असणारच ! पण, असा होण्याचा सेवेकऱ्याने प्रयत्न केला तर !
आपणाला किती वेळा सांगितले, “कर्तव्य सोडू नका.” भक्ती साधी, सोपी, तितकीच कठीणही आहे. त्यातून निभावून जाणे हे सेवेकऱ्याचे कर्तव्य आहे. माझ्या भक्ताची थोडीशी चाचपणी केली तर त्याला वाटते, आम्ही आपले सेवेकरी मग असे का?
बोलणे सोपे, तशी कृती सोपी आहे का? माझे लक्ष आहे की नाही, याची तुम्हास जाणीव राहणार नाही. पण इतकेच आहे, असूनही नाही. मग मी असूनही नाही असे का? पांडवांशीच मी सहकार्य केले, मग कौरवांचे हृदयी मी नव्हतो का? मग पांडवांचाच पाठीराखा का झालो? हे लक्षात घ्या. ©️