एकेका अक्षरात ॐ ची स्थिती आहे, मग ते अक्षर असो, मानवाचे शरीर असो अथवा इतरत्र स्थिती असो. ॐ विना दूसरी कोणतीही स्थिती नाही. लक्षात घ्या सर्वस्वात भरुन अलिप्त अशी जी स्थिती आहे, तिच पहाण्याची स्थिती सताने आपणास प्राप्त करुन दिधली आहे.
श्री समर्थ मालिक विचारणा करतात, नामाची मूळ उत्पत्ती कशी झाली? व पुढे स्पष्ट करताना म्हणतात, “मूळ ओंकारांपासून ध्वनी निर्माण झाला. त्यातच नाम प्रगट झाले. त्यापासूनच मनुष्य निर्माण झाला. मनुष्याला तारण्यासाठी भक्ती निर्माण झाली.”
आपण सर्वस्व सताचे सेवेकरी आहोत. सत् पूर्णात पूर्ण बहरलेले आहे. सत् सर्वस्व ठिकाणी आहे. सर्वस्वात सत् बहरलेले आहे. अशा सताला मानवी स्थितीप्रमाणे सद्गुरु संबोधतात. तेच परब्रम्ह !
परब्रम्ह कोणी पाहिले आहे का? तर नाही. मुळात परब्रम्ह हा प्रणव कसा आहे. अणु, रेणु, परमाणु अन् त्याच्या पलीकडेही हे सत् बिंदुस्वरुपी कसे वास करते अन् त्या बिंदुस्वरुपात, ते निर्गुण निराकार कसे आहे हे समजणे आवश्यक आहे. अशा या परब्रम्हाचे आपण सेवेकरी आहोत. असे हे परब्रम्ह आपण सद्गुरुंच्या साह्याने पाहू शकतो. त्या परब्रम्हाची कल्पकता आपणास सद्गुरुच देतील. सद्गुरुच तुम्हाला सताची पूर्णत्व ओळख करुन देतील.
अशा या परब्रम्हांच्या स्थितीत आपण कसे राहिले पाहिजे? तर लीनतेने, नम्रतेने, संयमतेने अन् मनाच्या सत् शुध्दतेने राहिले पाहिजे. मन सत् शुध्द नसेल तर तुम्ही दृढ:निश्चयी होऊ शकणार नाही. ज्या अवधीत तुमचे मन सत् शुध्द असेल त्या अवधीत तुम्ही सत् चरणाप्रत राहू शकाल. मन सत् शुध्द राहिल्यानंतर सत् शुध्दता हि येणारच ! पण मनाची चंचल स्थिती झाल्यानंतर आपण सतापासून दूर जाणार. (पुढे सुरु…४) ©️