समर्थ मालिक – “एक तत्त्व नाम दृढ धरी मना |” जो आपली भावना दृढ धरून, एका तत्त्वाशी ठाम राहू शकतो, एक मिनीष सुद्धा इकडे तिकडे ढळत नाही, तो सेवेकरी कदापिही वाया जाऊ शकणार नाही आणि जाणारही नाही, पण मनाची चंचलता वाढली तर मात्र त्याचे त्याने समजावे. मी सांगण्यात अर्थ नाही.
शरीर हे जडत्व आहे. तेव्हा जडत्वावर वाटेल ते व्याप, मायावी तऱ्हेचे म्हणा किंवा आणखी काही म्हणा, जर झाले, तर, सेवेकऱ्याच्या मनाची जी अस्थिरता, जी अदला बदल होते, ती होऊ न देता स्थिर राहण्याचा प्रयत्न करणे. जेवढी होता होईल तेवढी शांती टिकविण्याचा प्रयत्न करणे, तदनंतर त्याचा उपभोग अवश्य मिळेल. हे मात्र, असत नाही, सत्य आहे. त्याप्रमाणे आपापल्या कर्तव्यात, अखंड नामात, मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करणे.
आपल्या संगतीने काय येणार हे सेवेकऱ्यांना माहित झाले असेलच. संगती जे येईल तेच घेण्याचा प्रयत्न करणे. या जन्मी कमावलेली सत् संपत्ती, तिचा पुढील जन्मी उपभोग घेता येईल. सध्या दुःख वाटते, पण दुःख वाटून न घेता शांत रितीने राहणे, वावरणे हे सेवेकऱ्यांचे कर्तव्य आहे व हे संदेश आहेत.
काही सेवेकऱ्यांची मने हेलकावे खातात. त्यांना इतकेच सांगावयाचे, मनाला हेलकावे खाऊ न देता, नामातच स्थिर राहण्याचा प्रयत्न करणे. या घडामोडी अशा चालणारच. जडत्वाला शासन देणे हे त्या जडत्वाच्या कृतीमुळे घडते. सत् कृती असेल तर जडत्वाला त्रास घडणार नाही. असत संचित असेल तर त्याचे त्यालाच भोगावे लागते.
भोगत्व सुटलेले नाही. त्याबद्दल सेवेकऱ्याला दुःख वाटते, पण ते योग्य आहे की अयोग्य आहे याचा सेवेकऱ्यांनी विचार करावा. काही सेवेकरी व आसनाधीस्त सुद्धा मला असे म्हणतात, “मालिक तुम्हाला काय? तुम्ही निराकारी आहात.” पण सेवेकर्याला जो त्रास होतो, तो जरी मला सोसावयाचा नसेल व मला त्रास नाही हे सत्य आहे, पण सेवेकरी म्हटल्यानंतर आसनाधिस्तांची गार्हाणी, चार शब्द ऐकून घ्यावे लागतात. सेवेकऱ्यांचे चार शब्द ऐकून घ्यावे लागतात. मग यातून कोण सुटलेला आहे का? मग त्यासाठी वाईट वाटणे, चिंता बोलावणे योग्य आहे का? सत्, असत हे दोन्ही समान पात्रतेने ठेऊन, सेवेकरी वाटचाल करील, तर सेवेकऱ्याला सुखदुःखाची विभागणी, वाटप करणार नाही. याच तऱ्हेने सेवेकऱ्याने कर्तव्याचा मार्ग आक्रमण करणे हेच आजचे संदेश आहेत. (समाप्त) ©️