श्री विठ्ठल – उत्तम धर्म कोणता? तर मानव धर्म! मानव म्हणजे पूर्ण ओंकार स्वरूप आहे. पण काही मानवांना घेता येत नाही. या मानव जन्मात लांड्या लबाड्या करणे, आदेश मोडणे, आदेश धुडकावणे, याची शिक्षा म्हणून हे सत् तत्व काय करील याचा अंत मला सुद्धा नाही. पण इतके सांगायचे की, एकाचा अंत घ्या, मग शून्याचा ठाव मिळेल. एकाला सोडून शून्याचा ठाव लागणे, अंत लागणे कठीण आहे.
या ठिकाणी काही सेवेकरी आहेत, ते शून्याचा ठाव घेण्याच्या पाठीमागे आहेत. मी जरी महान तत्व असलो, तरी या ठिकाणी (या दरबारात) मी अज्ञान आहे. या ठिकाणी त्या पात्रतेचे सेवेकरी नाहीत, म्हणून प्रवचनांची जोड या ठिकाणी तुटलेली आहे, असे मला वाटते. जो भक्त अभिन्न बनला आहे, त्यालाच सताचे दर्शन होत असते. ज्याला सताचे दर्शन मिळाले, त्याला मी दूर नाही, पण मानव अभिन्न बनला पाहिजे. अभिन्न बनला नाही, तर त्याला गती मिळणार नाही. सत् हे सतावरच अवलंबून असते. ते असतावर अवलंबून नसते. पण असत म्हणते, मी फार चलाख आहे. सत् जरी शांत असले, तरी असताला तूरी लावून केव्हाच लांब जाते. मायेला टिचकी मारून त्यांचे कर्तव्य करून घेते. (समाप्त) ©️