श्री विठ्ठल – एकादशी या शब्दाचा अर्थ फार गहन आहे. खोल आहे. या मायावी मानवांनी याचा अर्थ केलेला नाही, घेतलेलाही नाही. उपास करून एकाचा अंत मिळत नाही. एक म्हणजे व्यक्ती म्हणजे आकार आला. एकातच रममाण झाल्यानंतर शून्याचा ठाव सापडू शकतो. एकाला धरूनच शून्याचा ठाव लागतो. एकाला धरले नाही तर शून्याचा ठाव सापडणे कठीण आहे. जो मूळ धरूनच वर जातो, त्यालाच ठाव सापडतो.
आकाराचा अंत घेतला नाही, तर निर्गुणाचा अंत सापडणार नाही. आकार हेच ॐ कार स्वरूपी नटवले आहे. शून्यातून निर्माण झाले आहे. एक तोच ओंकार, त्या आकाराला धरून मार्ग आक्रमवयाचा असतो. नाहीतर, एकही नाही आणि दोनही नाही. सर्व शून्यच शून्य! आकार शून्यात रममाण झाला, तरच शून्य होतो. पण आकाराला धरून जाईल तेव्हाच! असे या महान तत्वाने, नाना तर्हेचे आकार निर्माण केले आहेत. त्याच्यात आपण गुप्तपणाने व्यवहार करतात. आकारातच त्यांचा वास आहे. एकच हे तत्व सर्व ठिकाणी व्यापक असून, भरून उरले आहे. त्यातूनही सर्व ठिकाणी तर्हे तर्हेच्या, भिन्न भिन्न प्रकृती निर्माण केल्या आहेत. ते त्यांचे कर्मसंचित आहे. ©️