काही संतांनी म्हटले आहे, “झणी दृष्ट लागो तुझ्या सगुणपणा | जेणे माझ्या मना बोध केला |” मग त्यांनी ध्यान दृष्टी कशावर लावली होती? तर सगुणावर ! सगुणापासून त्यांना शांती मिळाली म्हणजे व्यक्ती पासून, जडत्वापासून जडत्वाला शांती मिळते. मग ज्या सगुणापासून सगुणाला शांती मिळते, ते सगुण कोणते असेल? म्हणून त्यांच्याजवळ काहीतरी अधिकार आहेत म्हणून हे शांती देऊ शकतात. तोच सगुण पाहता पाहता दृष्टीआड होतो. मग ज्ञानदृष्टी प्रगट होते. तदनंतर निर्गुण आपोआप प्रगट होते. आकार असून आकार रहित होते. मग तोच आकार स्थूल सोडून सूक्ष्म बनतो. नंतर कारण, नंतर महाकारण ! अशाही तऱ्हेने त्याच्या पलीकडे आपण गेला असाल. काही का असेना,
आकारी पाहिल्याशिवाय सगुणाची शांती होत नाही. संतांनी सांगितले आहे कि “मसुरा समान, मोतियाचे परी, असे दर्शवे द्वारी” ते आहे म्हणून सेवेकरी रममाण होतो. हे सर्व ठिकाणी आहे. कुठेही रिता ठाव नाही. मिळणार नाही. कोणाला? जो त्या जातीचा असेल, त्याला तो मिळेल, इतरांना नाही. म्हणून मुक्त होण्यासाठीच मानव जन्म आहे. तो पवित्र आणि श्रेष्ठ आहे. धारणा झाली की तो मुक्तच आहे. बाहेर पडल्यानंतर तो मुक्तच आहे. पण पुढे मायेत गुरफटून, तो बध्द होतो. म्हणून ही ओवी छान आहे. त्याप्रमाणे वाटचाल करणे हे संदेश आहेत.
पाप पुण्य कशापासून निर्माण होते? एका सेवेकर्यांने म्हटले आहे, “मालिक, तुम्हीच सर्व करता, दुसरे कोणीही नाही.” अशा सेवेकर्याला काय म्हणावे हे कळत नाही. मी जर सर्वस्व करतो, तर त्याचे प्रायश्चित्त मला मिळाले पाहिजे, मग सेवेकरी का भोगतो? यावर पूर्ण विचार करून, त्याप्रमाणे वाटचाल करणे. त्याप्रमाणे सेवेकऱ्यांनी वाटचाल करावी हे संदेश आहेत. (समाप्त)©️