विठ्ठल – एकादशी या शब्दाचा अर्थ फार गहन आहे. या मायावी मानवांनी याचा अर्थ केलेला नाही, घेतलेलाही नाही. उपास करून एकाचा अंत मिळत नाही. एक म्हणजे व्यक्ती, म्हणजे आकार आला. एकातच रममाण झाल्यानंतर शून्याचा ठाव सापडू शकतो. एकाला धरूनच शून्याचा ठाव लागतो. एकाला धरले नाहीत तर शून्याचा ठाव सापडणे कठीण आहे. जो मूळ धरूनच वर जातो, त्यालाच ठाव सापडतो.
आकाराचा अंत घेतला नाही तर निर्गुणाचा अंत सापडणार नाही. आकार हेच ॐ कार स्वरूपी नटवले आहे. शून्यातून निर्माण झाले आहे. एक तोच ॐ कार, तोच आकार. त्या आकाराला धरून मार्ग आक्रमायचा असतो. नाहीतर एकही नाही आणि दोनही नाही. सर्व शून्यच शून्य ! आकार शुन्यात रममाण झाला तरच शून्य होतो. पण आकाराला धरून जाईल तेव्हाच ! असे या महान तत्वाने नाना तऱ्हेचे आकार निर्माण केले आहेत. त्याच्यात आपण गुप्तपणाने व्यवहार करतात. आकारातच त्यांचा वास आहे. पण, एकच हे तत्व सर्व ठिकाणी व्यापक असून भरून उरले आहे. त्यातूनही सर्व ठिकाणी, तऱ्हे तऱ्हेच्या भिन्न भिन्न प्रकृती निर्माण केल्या आहेत. ते त्यांचे कर्मसंचित आहे.
उत्तम धर्म कोणता? तर मानव धर्म ! मानव म्हणजे पूर्ण ॐ कार स्वरूप आहे. पण काही मानवांना घेता येत नाही. या मानव जन्मात लांड्या लबाड्या करणे, आदेश मोडणे, आदेश धुडकावणे याची शिक्षा म्हणून, हे सत तत्त्व काय करील याचा अंत मला सुद्धा नाही, पण इतकेच सांगायचे की, एकाचाच अंत घ्या. मग शून्याचा ठाव मिळेल. एकाला सोडून शून्याचा ठाव लागणे, अंत लागणे कठीण आहे.
या ठिकाणी काही सेवेकरी आहेत, ते शून्याचा ठाव घेण्याच्या पाठीमागे आहेत. म्हणून ही घडण या ठिकाणी घडली आहे. काय म्हणायचे आपणाला? मी जरी महान तत्व असलो, तरी या ठिकाणी अज्ञान आहे. त्या पात्रतेचे सेवेकरी या ठिकाणी नाहीत. म्हणून प्रवचनांची जोड या ठिकाणी तुटलेली आहे असे मला वाटते. जो भक्त अभिन्न बनला आहे, त्यालाच सताचे दर्शन होत असते. ज्याला सताचे दर्शन मिळाले, त्याला मी दूर नाही. पण मानव, अभिन्न बनला पाहिजे. अभिन्न बनला नाही तर, त्याला गती मिळणार नाही. सत् हे सतावरच अवलंबून असते. ते असतावर अवलंबून नसते. पण असत म्हणते, मी फार चलाख आहे. सत जरी शांत असले, तरी असताला तुरी लावून केव्हाच लांब जाते. मायेला टिचकी मारून त्यांचे कर्तव्य करून घेते. (समाप्त) ©️