श्री समर्थ मालिक – सर्वांच्या हृदयी सत आहे. परमेश्वर सर्व व्यापक आहे. पण तो कोणत्या गतीने, त्याचे वर्णन काय? मानवाने पाहिले म्हणावे, तर तो मार्ग विसरतो कां?
प्रकृती आहे. ही प्रकृती किती तऱ्हेने नटलेली आहे? सेवेकऱ्याने प्रकृतीचा तरी अंत घेतला आहे का? प्रकृतीला जर अंत नाही, मग अंत लावू शकता का? प्रकृतीला भ्रांती घालून माझा शोध लावला आहे का? तर नाही. जितक्या ज्योती, तितक्या प्रकृती, आपल्या मनाप्रमाणे मार्ग आक्रमित असतात. प्रत्येक मानव आपल्या मनाप्रमाणे समजत असतो की, मी कोणीतरी विशेष आहे. प्रत्येक जण असल्या मताचे प्रतिपादन करीत असतात. एकाच मताने सर्वजण वाटचाल करतील, तर भिन्नत्व निर्माण होईल का? म्हणून सेवेकऱ्याने अभिन्न बनण्याचा प्रयत्न करा.
मायेचा अंत सापडलेला नाही. आसनाधिस्त हे साधेसुधे तत्त्व नाही. त्याना कोणीही ओळखले नाही. करूनही अकर्ते असे तत्त्व आहे ते ! तेथूनच प्रणव, बोल निघतात, म्हणून त्या तत्त्वाच्या दोन गोष्टी ऐकून घ्याव्या लागतात.
मानवाकडून, जडत्वाकडून असत कृतीची भरपाई झाल्याशिवाय सत् त्याला हात घालत नाही. भरपाई झाल्यानंतर त्याला विलंब नाही. कोठून चक्र फिरुन तो खड्ड्यात पडेल त्याचा अंत मिळणार नाही. म्हणून सेवेकऱ्याने सुखदुःखाची व्याख्या करून, ती त्याने आचरणात आणावी. भक्ती, ही साधी, सोपी, सोज्वळ, सताच्या सानिध्यात आहे. त्या सत, साध्या भक्तीने जाल, तरच सुख मिळवाल, जर मनाची चंचलता वाढली तर ती कृती तुम्हालाच जाचक होईल.
संतांनी असे म्हटले होते, “कितीही दुःख झाले तरी, नाम घेतल्याविना राहणार नाही.” तरी यावर आपण विचार करावा. (समाप्त)©️