श्री समर्थ मालिक – कर्मयोगातल्या शाखा दोन आहेत – एक सत् आणि एक असत !
संतांनी लिखाण करून ठेविले आहे – सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वां मुखी मंगल बोलवावे ! सध्याच्या युगात कोणी सेवेकरी असा झाला आहे का? भारतातील सर्व मानव, सत्कर्म योगाने मुक्त असते तर, भारताची ही स्थिती झाली नसती. म्हणून जन्माला घातल्यानंतर प्रथम धर्माची व्याख्या होते.
धर्म म्हणजे काय? त्या धर्माच्या शाखेतून पार पडल्यानंतर, त्याच्यापुढे दोन कर्तव्ये असतात. त्यापैकी तो कोणत्या शाखेने जाईल, हे त्याचे तो जाणे. सत्कर्म योग म्हणतात – जर सत मार्गी चालला, तर जन्मोजन्मी सत् मार्गीच जाणार. त्याची जर घालमेल झाली तर पुन्हा जन्म घ्यावा लागतो. असे कितीतरी वेळा त्याला जन्मास पाठवावे लागते. पूर्णात पूर्ण मिलन झाल्यानंतर जन्म घेणे नाही. म्हणून ज्ञानेश्वरा सारख्या महान संतांनी वाक्यरचना केली, त्याप्रमाणे सेवेकरी होईल तर हाच त्याचा सत्कर्म योग म्हटला आहे.
ज्या भक्ताला चमत्कार पाहिजेत, नाव पाहिजे, लोकांनी मानले पाहिजे, मी कोणीतरी आहे अशी ज्यांची भावना असते, महान साधू आहेत, त्याने जर चमत्कार दाखविले, तर हा कोणीतरी महान योगी आहे असे मानव म्हणतात. पण मानवांना अद्याप कळलेले नाही, जो वाटेल त्या परिस्थितीत आपली सत् चाकोरी ढळू देत नाही, त्यालाच महान सत्पुरुष म्हटलेले आहे. त्याला सत आणि असत दोन्हीही सारखेच असतात. असताचे बोलामुळे त्याला जरी वाईट वाटले तरी तो वाईट वाटून घेत नाही. असत कशाच्या जीवावर बोलते हे त्याला सर्वस्व कळते.
ज्याच्या ठिकाणी तंत्र मंत्र, ऋद्धी सिद्धीचा वास आहे, अशा ठिकाणी सत राहणार नाही. त्याला वाटते ऋध्दीसिध्दी हेच सर्वस्व आहे, पण ज्या ठिकाणी हे सर्वस्व गुप्त आहे ते त्याला कळलेले नाही. पण अशा ज्योतीला अखंड चमत्कार पहावयास मिळाले, तर ती ज्योत विचार करते. पण तो विचार केल्यावर का लाघव होत नाही असा विचार करतो. परंतु हे त्याला कळत नाही कारण सताची जाणीव असणे फार दुरापास्त आहे. म्हणून सेवेकर्यांनी सत्कर्म योग गाठण्याचा प्रयत्न करावा. असा प्रयत्न केल्यास त्याला, योग म्हणजे काय, हे कळेल. (पुढे सुरु….२)©️