श्री समर्थ मालिक – समर्थाचिया सेवका वक्र पाहे | असा सर्व भूमंडळी कोण आहे |जयाची लिला वर्णिती लोक तिन्ही | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी || समर्थांचा जो सेवेकरी आहे, जो सत आहे, तो सत् मार्गाने जाण्याचा प्रयत्न करीत असतो, त्याला समर्थांशिवाय, सद्गुरुंशिवाय, एकाच तत्त्वाशिवाय काही दिसत नाही. असा सेवेकरी अह:र्निश त्यांच्या चरणात लिन झाला असता, त्याच्यावर एखादा शत्रू, चोर, सावज कोणी जरी असले, तरी अशा सेवेकऱ्यावर चाल करतात नाही का? तर नाही. समर्थांच्या सेवेकर्यावर कोणाचेही काही चालत नाही, चालू शकत नाही. चत्वार खाणीतील प्राणी, सर्प, पिशाश्च कोणाचेही काही चालत नाही. का चालत नाही? कारण तो सताचा सेवेकरी, सताचा भक्त असतो. दुश्मन वाईट कृती जरी करू लागला, तरी त्याचीच कृती त्याच्या अंगावर येते.
जो समर्थ सेवेकरी आहे, तो सत् आहे, पण सताच्या जोडीला असत हे असतेच ! हे आदिअंतापासून सर्वस्वांना ज्ञात आहे. सताच्या ठिकाणी असत हे आहेच, पण सताचा कोणी केस तरी वाकडा केला आहे का? त्याचे कारण काय? ज्याच्या मनाची भावना शुद्धत्वाने सताच्या ठिकाणी रममाण झाली आहे, त्याला चोर, सर्प, वाघ सर्व समान दिसते. समर्थमय झालेल्या ज्योतीला, समर्थ तत्त्व सर्व ठिकाणी दिसते. त्याला समर्थांची ओळख झालेली असते. त्याच्या ठिकाणी क्रोध, अहंकार, मी, तू हे नसते. त्याच्याजवळ काही शिल्लक नसते.
त्याने सर्वस्व अहंकार मारला, सर्वांचा त्याग केला, तर अशा सेवेकर्याला कोण काय करणार? याचा अनुभव रामदासांनी घेतला म्हणून त्यांनी हे लिखाण केले आहे. मग त्यांच्याप्रमाणे सेवेकरी समर्थमय, सद्गुरुमय होतील का? अशा सेवेकऱ्याचा कोणी केसही वाकडा करू शकणार नाही. त्याला कसलीही न्यूनता भासणार नाही. तो भीक मागण्यास जाणार नाही. समर्थ त्याला भीक मागू देणार नाहीत. पण कर्तव्य कोणते हे माहीत असून सुद्धा दुसरीकडे भटकत राहिला, चेष्टा, मस्करी करीत राहिला किंवा आणखी व्याप करीत राहिला, तर समर्थांचे त्याच्यावर अह:र्निश लक्ष असते. पण अशा सेवेकर्याला थोडीशी बाजू देतात.
एकच तत्व सर्व ठिकाणी व्यापक आहे. ही गती मिळाली असताना, अखंड तत्व बहाल केले असताना, त्याचाच सेवेकऱ्यांनी उजाळा करणे. सद्गुरुं शिवाय आणखी दुसरे तत्व कोणी आहे का? म्हणून याच तऱ्हेने सेवेकऱ्यांनी समर्थमय होण्याचा प्रयत्न करणे हे संदेश आहेत.©️