श्री समर्थ मालिक – नाते म्हणजे तरी काय? नाते म्हणजे संबंध. हा संबंध कशा तर्हेने असतो? ज्या सत् पदापासून बीजारोपण झाले, त्याचाच अंश म्हणजे मानव प्रकृती होय. हे सत् सानिध्य असेल, तर हेच सानिध्य घेत घेत अनेक जन्म घ्यावे लागतात.
प्रत्येक जन्माच्या सानिध्यात एकमेकांची जाणीव नसते. सर्व नात्यात, आई व मूल हे नाते श्रेष्ठ आहे. निमित्ताला कारण की, मातेच्या उदरी बालकाचा जन्म होतो, त्याहीपेक्षा “सद्गुरु व सेवेकरी” ही गती श्रेष्ठ आहे. हे नाते कसे आहे? ज्या वेळेला सेवेकरी सद्गुरूंच्या ठिकाणी रममाण होतो, त्याच वेळेला ओळख होते! हे सानिध्य घेत घेत प्रगटीकरण होते व तो अनुग्रहित होतो.
या आसनाचा सेवेकरी बनणे म्हणजेच पुन:र्जन्म होय! हेच नाते सेवेकर्यांनी पूर्णत्व जाणावयाचे असते. मगच सेवेकरी चरणात रममाण होईल. असे जर हे नाते आहे, तर सेवेकरी चुकतात का? कारण,
मूल जन्माला आल्यानंतर बालस्वरूप, ब्रह्मपद असते. पण ज्यावेळेला कलियुगाचा स्पर्श होतो, येथील वारा लागतो, त्या वेळेला त्याची, हे ब्रह्मपद जरी अखंड असले तरी चंचल गती निर्माण होते. त्याचप्रमाणे अनुग्रहाच्या वेळी बालगतीप्रमाणे तो लिन होतो. त्यावेळेला आत बाहेर काहीही नसते. पण बाहेरचा वारा लागला की, तो चुकतो. मग सद्गुरु काय करतात? सेवेकरी षड्रिपूत गुरफटला असताना आपल्या मुखातून बोल फेकतात व त्याप्रमाणे तो मुक्त होतो. पण मनाच्या तरंगात गुरफटतो. विसरतो व चुकतो. मग सद्गुरु तत्त्व हेलावते. अंत:करण शुद्ध असते. त्यांची एकच भावना असते की, माझा सेवेकरी सतशुद्ध गतीने जाऊन या चरणांवर लिन झाला पाहिजे. ©️